Skip to main content

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण


रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे.

एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली,

“सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!” 

मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत.

वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता. 

दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती. 

आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं अजिबात बंधन नसणाऱ्या, अगणित स्क्रोल करता येऊ शकणाऱ्या सोशल मिडीयाच्या फिड्स प्रत्येकाच्या हातात आहेत. त्या भरायच्या म्हणजे तेवढी चॅनेल्स आली. 

तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, देशातल्या, परदेशातल्या, जगातल्या, परग्रहावरच्या सगळ्या घडामोडींचा आपला ॲक्सेस आहे. 

जेवढे टीव्ही चॅनेल्स तेवढी सोशल मीडिया पेजेस, जेवढी वर्तमानपत्रे तेवढे पेजेस, त्याशिवाय इनफ्लुएन्सर, वैयक्तिक पत्रकार, या पक्षाचे त्या पक्षाचे असे हजारो माहितीचे स्रोत!

नाही, एखादी माहिती ही ज्ञानाचा भाग असेल तर तिचा अखंड स्रोत मिळावा. पण बातम्या किंवा निधन वार्ता वाचून आपण “ हे काय आता रोजचंच झालंय” असं म्हणू लागलो तर माणूस म्हणून आपण कुठे प्रवास करतो आहोत? 

उगाच मिळत चाललेल्या, बहुतेक वेळेला निरोपयोगी असलेल्या ह्या बातम्यांचं आपण काय करतोय? आपल्या मेंदूत कसं प्रोसेस करतोय हे सगळं? फिल होऊ नये म्हणून ह्रदयाकडे जाणारे त्याचे दोर कापत नाही ना तो?

बरं यात आपण वैयक्तिकरित्या ह्या पेजेसना फॉलो केलं नाही तरी ह्या बातम्या ट्रेंडिंग असतात, त्यांचा रिच तुमच्या वॉलपर्यंत पोहोचणारच आहे. 

माणूस म्हणून आपलं किंवा एखाद्याचं जगणं या बातम्यांच्या ढिगाऱ्याखाली कवडीमोल होऊ नये. मला कुणाचीही मृत्यूवार्ता दिसली की त्यांच्या घरच्यांचं काय होत असेल विचार करून डोळ्यात चटकन पाणी येतं. हे असं खूप वाटत राहिलं की निराश वाटू शकतं. आपलं आयुष्य छान चालू असलं तरी एखादी अकाली मरणाची बातमी वाचून आयुष्य क्षणभंगुर आहे असं वाटून ते जगण्याच्या उत्साहावर काही काळ ते परिणामी करू शकतं. 

पण म्हणून ते फिलच करून घ्यायचं नाही असा प्रयत्न करणं हे एक माणूस  म्हणून मला पटत नाही. तो एक भावनिक आणि सांस्कृतिक ऱ्हास आहे.

सोशल मीडिया वाईटच आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. त्याचे फायदे सांगताना किती तरी स्वतंत्र लेख होतील. मुद्दा त्या प्रवाहात अकारण मिळत चाललेल्या डेटाचा आहे. 

कमीत कमी काय करू शकतो, आपण स्वतःहून जे फॉलो करतोय ते प्रसन्न, पॉझीटीव आहे का हे तपासून घ्यावं. यात माणसं पण आली. सतत रडक्या पोस्ट टाकणाऱ्या किंवा कुणाला तरी उद्देशून काही तरी तिरकस लिहणाऱ्या बाळबोध लोकांना सरळ हाईड किंवा ब्लॉक करावं. हेच न्यूज चॅनल्स किंवा इन्फ्लूएन्सर्स बाबतीतही लागू होतं. 

सोशल मीडियावर काही काळ घातल्यानंतर, त्याचा प्रभाव काही काळ डोक्यात चालू राहतो. आधी सोशल मीडियाचा वेळ कमी करावा. ते सोडून वैयक्तिक आयुष्यात इतर भरपूर ॲक्टिवीटी असाव्यात. 

वाचन, व्यायाम, संवाद, चालणे,गायन/ नृत्य / चित्रकला इत्यादी कला जोपासणे, स्क्रीनशी संबंध नसलेल्या भरपूर गोष्टी आयुष्यात करणे , एखादं नाटक पाहणे, लाईव्ह परफॉर्मन्सेस पाहणे, आर्ट गॅलरीज धुंडाळणे, नव्या लोकांना भेटणे हा मेंदूसाठी खुराक असतो. आपल्या भावना, संवेदनशीलता , विचार तासून लख्ख ठेवण्याचं काम या गोष्टी करतात. 

सगळं जगच यांत्रिक होतंय. आपणच केलंय. आधी सोय असणारं सगळं आता गरज झालंय. चटकन मुव ऑन होण्याचा काळ आहे. संवेदनेतून मुव ऑन होता होता माणूस म्हणून मुव ऑन होऊन आपलं यंत्र नको व्हायला असं वाटतं. 

लिहीण्यासारखं बरंच आहे पण हा लेख रिमाईंडर आहे. ह्या सगळ्या यांत्रिकी खडखडाटात माणूस म्हणून आपलं ओलेपण जपून ठेवण्यासाठी जे जे आवश्यक ते सगळं करत राहायचं आहे सांगण्यासाठी हा छोटा रिमाईंडर!

- प्रज्ञा 

Comments

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...