Skip to main content

अथांग


खूप दिवसांचा बोलवत होता म्हटलं जाऊन यावं

अथांग विशाल असलेलं त्याचंही मन जरा राखावं ।

मला पाहून खुश झाला,गडगडाट करीत हसला

हसून हसून कसा पुरता हिरवा निळा होऊन गेला ।

म्हणाला माझ्यावर लिहिणार वगैरे असशील तर आधीच सांग

तुझ्यासाठी सोपा करेन कुणाला न सापडणारा माझा थांग ।

मला शांत शांत बघून तोही झाला अंतर्मुख जरा

म्हणाला धून ऐकशील का थोडी, वाहवू का थंडगार वारा ।

म्हणालीस तर पाण्यालाही सांगतो थोडं खळखळतं संगीत द्यायला

पानांची सळसळ तर केंव्हाचीच तयार होऊन बसलीये साथीला ।

या सगळ्याचा परिणाम म्हणून माझंच मन खदखदून आलं

पोटातलं दुःख कसं मी कसोशीने ओठावरचं थांबवलं ।

त्यावर तिरकस हसत म्हणाला रडायचं तर रडून घे खुशाल आता

तुझ्या जगातल्या लपवाछपवीच्या इथे नकोस मारू बाता ।

ना जाणो कित्येकांची मन ठेवलीत मी नीट राखून

तुझ्याही मनाचा मोती ठेवेन की एखाद्या शिंपल्यात झाकून ।

त्या निरव शांततेत माझ्या हुंदक्याचा आवाज घुमला ।

दुःखाचा पूल तुटून रडण्याचा आवाज त्या आभाळाला भिडला ।

किती वेळ होऊन गेला याची मोजदाद न्हवती

माझं मन मोकळं होईपर्यंत शांतता त्यानंही राखली होती ।

हलकेच विचारलं त्यानं आता कसं वाटतंय?

ओझ्याने भारलेलं तुझं मन आता मोरपिसासारखं भासतंय ।

मी चटकन त्याच्या कुशीत शिरले

डोळे पुसत त्याचे आभार मानले।

आभारप्रदर्शन बघून त्याचा स्वर मात्र जरा भारावला

त्यानं ओळखून घेतलेलं की निरोपाचा क्षण आता आला ।

म्हणाला मला सवय आहे याची तू नकोस वाईट वाटून घेऊ

तुम्हा सगळ्यांची सुख दुःख आम्ही अशीच सांभाळून ठेऊ।

फक्त पुन्हा कधी येशील तेवढं मात्र सांग आता

हजारोंच्या गर्दीतुन वाट काढून तुझी माझी लिहूयात कथा ।

त्याला सोडून निघताना ढगातून हलकेच दोन थेंब येऊन हातावरती ओरघळले

त्यांनाच दौतीत टाकून मी असे कागदावरती उतरवले ।

~प्र. ज्ञा. जोशी

Comments

Popular posts from this blog

पहिलं घर

घर कशाला म्हणायचा हा प्रश्न मला माझं सोलापूरचं घर सोडल्यापासून सतत पडत आलाय. नोकरीनिमित्त मी ज्या ज्या ठिकाणी गेले आहे आणि राहिले आहे ते प्रत्येक घर मला माझं आणि आपलं वाटलं आहे. त्या प्रत्येक घराने मला भरभरून प्रेम आणि यश दिलं आहे. आयुष्य झपाट्याने बदलत गेलं आणि आम्ही एका अश्या देशात आलो, ज्याला आपलं म्हणताना किंवा त्या देशाने आम्हाला आपलं म्हणत असतानाच आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि ह्या देशात आमच्या नावाचं एक घर उभं राहीलं.  पहिलं घर घेणं हा एवढा भावनिक निर्णय का असतो? विचार करत गेलं की समजतं, ही गोष्ट फक्त एका कागदावर सही करणं असतं का? पैसे देऊन तर आपण भाड्याच्या घरात पण राहतो मग स्वत:च्या नावावर असलेल्या घराची ही ओढ कसली? पृथ्वीवर माणूस उपराच म्हणतात, त्याच पृथ्वीच्या अवाढव्य गोलावर एक ठिपका माझा! मी इथे जगून गेलो, कष्ट करून गेलो, काही कमावून गेलो त्याचं हे प्रतिकात्मक रूप, असा विचार माणसं करत असतील का? की माझं म्हणजे जिथे मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य! ह्या स्वातंत्र्याची ओढ त्यात असावी. कारण काहीही असलं तरी हा निर्णय भावनेने भरलेले असतो हे मात्र नक्की.  मध्यंतरी कुठे त...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...

रिकामं घर आणि लेखकांची मैफिल

आमचं घर शिफ्टिंगचं काम संथ गतीने चालू आहे. मागच्या काही महिन्यात आम्ही इतकी धावपळ करतोय की आता शिफ्टिंगचं काम आरामात हळूहळू करतोय. तर सगळ्यात आधी प्रथेप्रमाणे नवीन घरी पुस्तकं गेली. आज पुस्तकांचा शेवटचा लॉट तिकडे नेल्यावर रिकाम्या हॉलमध्ये दोघे बसलो होतो.   पुस्तकांकडे प्रेमाने नजर फिरवताना, मला लक्षात आलं की ही पुस्तकं मी वेगवेगळ्या देशात, राज्यात, गावात खरेदी केलेली आहेत. मग त्यातले लेखक कवी पाहताना त्यांच्यात असलेलं साधर्म्य आणि फरक दिसू लागले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय सगळ्याच बाबतीत वेगवेगळी मते असलेली ही बुद्धिवान माणसं!   काही पुस्तकं मला इथल्या मित्रमंडळींनी भेट दिलेली आहेत तर काही अनोळखी पुस्तकप्रेमी लोकांनी दिलेली आहेत. सगळ्याच विषयांवरची पुस्तकं आहेत. काही लेखक कवी हयात आहेत तर बरेचसे या जगात आता नाहीत.    हा विचार डोक्यात घोळत असतानाच जय निघूयात म्हणाला आणि आम्ही दरवाजा बंद करून निघू लागलो. बागेकडे असलेल्या खिडकीतून उन्हाची तिरीप पुस्तकांच्या गठ्ठ्यांवर पडली होती. ते चित्र विहंगम दिसत होतं म्हणून का काय माहिती नाही, पण मला वाटलं, आम्ही इथू...