Skip to main content

सांग आता प्रभा मोठी कोणाची?


पहाटेच्या सूर्याच्या पहिल्या किरणाबरोबरच ते दोन तेजस्वी डोळे उघडले.

त्या वातावरणातील तेज सूर्याचं की त्या दोन डोळ्यांचं असा प्रश्न पडावा इतके ते सुंदर,मोहक,टपोरे धारदार नेत्र....

ती उठली...

ज्या पायात गुलामीची, पारतंत्र्याची दोर बांधली होती, त्या पायातले घुंगरू वाजले.

ज्या हातांवर अन्यायाचे वळ उमटले होते, ते तिनं तोड्यानी,पाटल्यानी, बांगडयांनी झाकून घेतले.

प्रत्येकवेळी संतापल्यावर फुरफुरणारे तिचे नाजूक बाहु,जे वेळोवेळी बळांनी शांत केले गेले होते,

त्यावर तिने बाजूबंद चढवले.

आवाज दाबून टाकलेल्या त्या गळ्यावर तिने ठुशी घातली.

स्वतःच्याही मनाची राणी नसणाऱ्या तिने त्याखाली राणीहार घातला.

ज्याच्याविरुध्द संतापाची,अन्यायाची आग छातीत जळत होती ,त्या छातीवर त्याच्या नावाचं भरभक्कम मंगळसूत्र चढवलं.

ज्याचं सौंदर्य तिच्यासाठी शाप ठरलं होतं, त्या कम्बरेवर तिनं कंबरपट्टा घातला.

जिच्या भाळी भविष्य लिहायचा हक्क खुद्द तिच्या सटवाईला देखील न्हवता, त्यावर तिनं कुंकू रेखलं.

डोळ्यातील वेदनेच्या, वेदनेनी सांडू पाहणाऱ्या अश्रूंच्या निषेधार्थ तिनं काळ काजळ घातलं.

सगळी आसवं गोळा करून त्यांचा निर्धाराने गजरा माळला.

आतून संतापून उठलेल्या महाकालीला तिने वरकरणी सुमुखी,संयमी श्रीलक्ष्मीच स्वरूप दिलं.

ते नखशिखांत लावण्य नजरेसमोर आलेल्या सुर्यासमोर उभं ठाकल.

ती गर्जली!

"जळतोस तू ही, जळते मीही,

तुझी आग फक्त दिवसाची,

तर माझी दिवसरात्रीची,

तुझ्या अन माझ्यात,

सांग आता प्रभा मोठी कोणाची?"

~प्र. ज्ञा.जोशी

Comments

Popular posts from this blog

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...