Skip to main content

केंव्हा तरी पहाटे


 भल्या पहाटे गार वाऱ्याची झुळूक आली.

त्या वाऱ्यासोबत तुझ्या केसांचा सुगंध…

काल रात्री मी आणलेल्या गजऱ्याच्या कळ्यांचा अजूनही हवेत असलेला दर्प जाणवला.

झटकन कुशीवरून वळलो.तू गाढ झोपलेलीस.

पुन्हा तोच निरागस चेहरा, तेच टपोरे शांत डोळे , तेच गुलाबाच्या पाकळीसम दुमडलेले गुलाबी ओठ,

पुन्हा माझं मानेखाली हात घेऊन तुला बघत बसणं,

तुझ्या चेहऱ्यावर खिडकीतून येणारा चांदण्याचा प्रकाश हातानी अडवण आणि पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडणं.

कितीदा अन कसा कसा तुझ्या प्रेमात पडावं मला खरंच कळत नाही बघ...

त्या नाजूक गोऱ्यापान हातांमध्ये मी माझा हात गुंफला तर झटकन वळलीस आणि माझ्या कुशीत शिरून झोपलीस.

अगदी लहान मुलासारखी……

मला जर कुणी विचारलं न की जगातला सगळ्यात आनंदी क्षण कोणता?

तर मी क्षणार्धात उत्तर देईन!

"गाढ झोपलेल्या तुझ्या केसांवरून हात फिरवत फिरवत तुला कुशीत घेऊन झोपणं"!

का कुणास ठाऊक तुझ्या आवडत्या गाण्याच्या दोन ओळी गुणगुणाव्याश्या वाटल्या.

“केंव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली,

मिटले चुकून डोळे,हरवून रात्र गेली…..”

किती नशीबवान आहे ग मी,आत्ता या क्षणी स्वर्गसुख म्हणजे काय ते कळतंय मला.

माझ्या या निरागस, सुंदर बायकोच्या सौंदर्यावर जणू मला हक्क दाखवायचा होता म्हणून हलकेच ओठ तुझ्या

कपाळाजवळ नेले.

पुन्हा प्रेमात पडलेला मी…..

पुन्हा एकदा जागा झालो….

रोजच पडणाऱ्या त्या स्वप्नातून…..

आजही फसवलं होत मला….

तू, त्या रात्रीनी, त्या मोगऱ्यानी,त्या चांदण्यांनी,त्या झुळुकीनी….

मी ही फसलो होतो….रोजच्यासारखा…..

पुन्हा तेच स्वप्न,

पुन्हा तुझा भास,

पुन्हा ते जाग होणं,

पुन्हा तुझं नसणं,

पुन्हा माझं मूक पण आर्ततेने अंधारात रडणं…..

पुन्हा तुझ्या मोगऱ्याचा हार घातलेल्या फोटोकडे बघणं….

आणि नियतीनं माझ्यावर हसून क्रूरपणे गुणगुणण….

“उसवून श्वास माझा, फसवून रात्र गेली”

-प्र. ज्ञा.जोशी

Comments

  1. अप्रतिम शब्दांचा शृंगार.... शुभेच्छा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...