Skip to main content

बाप आहे मी तिचा!


 (Written for the strongest bond of all those great fathers in the world and their darling daughters)

"To my शेर"

आधीच सांगतो, "बाबा तू रडतोयेस का रे?"असं विचारायचं नाहीस.अवघड जात ग तुझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर देणं.खरं

सांगू ,मला खूप हेवा वाटतो निशादचा...माझी बाहुलीसाठी हट्ट करणारी छोटी परी ज्यावेळी खऱ्या आयुष्यात चालत्या

बोलत्या बाहुल्याच्या प्रेमात पडली, खूप भीती वाटली ग...असं कसं माझ्या बाळाला दुसऱ्याच्या हाती सोपवायचं? तुझी

आई टोमणा मारून गेली,"मी न्हवते आले तुमच्यासोबत घर मागे सोडून?"

तू पहिल्यांदा पाऊल टाकलस ना तो फोटो बघत बसलेलो.तू सप्तपदीमध्ये पहिलं पाऊल टाकलस ना तेंव्हाही

वाटलं.आत्ता-आत्ता तर माझा हात सोडून चालायला शिकलेलं पिल्लू आज आयुष्यात खूप मोठं पाऊल टाकतय!

बापाचं काळीज आहे ना ग,बोलून दाखवता येत नाही....पण काळजी वाटते.लग्नाच्या पंगतीत निशाद तुला घास भरवत

होते,सगळे फोटो काढत होते, हसत होते,मी मात्र कोपऱ्यात उभा होतो.थोडासा खट्टू होऊनच...तुला पहिला दात

आलेला त्यावेळी तुला 'गम गम भात' भरवलेला न मी ते आठवलं.....तुझ्या परीक्षेच्या काळात तुझ्या मागे मागे येऊन

घास भरवायचो पण आज मात्र मी बाजूला होतो, खूप समजावलं मनाला...पण तरी...निशादचा खूप हेवा वाटला...

भटजी घाई करायला लागले तेंव्हा तुला बोलवायला तुझ्या खोलीत आलो.मेअकपवाली तुझी हेअरस्टाईल करत

होती.एकदा तुझी आई गावाला गेल्यावर मी तुझे केस बांधले होते.अर्धे बाहेर-अर्धे बांधलेले.तरी खूप गोड दिसत

होतीस.आजच्या तुझ्या 'लूक'पेक्षा तेंव्हाही चिऊ मला जास्त आवडली होती.का माहिती नाही...

कोणी तरी येऊन म्हणून गेलं, "काका शेरवानीत छान दिसताय!"मी पटकन म्हणून गेलो, "हो आमच्या चिऊनी घेतली

मला"!! तुझा पहिला पगार झाला ना,त्यादिवशी खूप मिश्र भावनांनी मी स्तब्ध झालो होतो.मला न्हवता ग एवढा

पगार.पण माझ्या मुलीला मिळाला."तुम्हाला मुलगा नाहीये का?" अस विचारणाऱ्या त्या प्रत्येक बेकार मुलाच्या

बापाला जाऊन हे सांगावस वाटलं की लहानपणी वडिलांनी घेतलेल्या कपड्यानंतर जर कुणी मला हौसेने कपडे

घेतले असतील तर ते माझ्या मुलीने घेतलेत.मला तुझा सार्थ अभिमान वाटतो बाळा तुझा!

तुझ्यासमोर रोखून धरलेल्या सगळ्या भावना घरी गेल्यावर तुझ्या खोलीत जाऊन मोकळ्या केल्या. बाप म्हणे

मोठ्यानी रडत नसतो.पण तुझं कपाट, तुझा पसारा, तुझे कपडे काहीच जागेवर न्हवतं...दुखलं ग हृदयात...घरभर

पैंजणांचा आवाज करत दुडूदुडू धावणारे पाय आज वाजत न्हवते...माझं तुझ्या दंग्यांनी भरलेलं घर शांत शांत भासत

होतं...

"बाबा या न फोटो काढुयात" तुझा आवाज कानी पडला आणि चटकन वळलो.तुम्ही निशादचा वडिलांसोबत फोटो

घेत होतात...हसलो पण डोळ्यात पाणी आलं,माझं लेकरू नवीन लोकात चटकन मिसळून गेलंय याचा आनंदही

झाला.

लग्नातल्या त्या 'कन्यादान' विधीचा तर रागच आला.आधीच मी माझं सर्वस्व दिल जावयाला.इतकंच काय, तुझ्या

नावपुढंच माझं नाव काढून त्याच्या नावासाठी जागा पण करून दिली.आणि त्यात पुन्हा हे दान वगैरे...

माझाच चेहरा घेऊन जन्मलेल्या माझ्या शेरावर मला पूर्ण विश्वास आहे.जस तू आपलं घर चांदण्यांनी उजळून

टाकलस तसं तेही घर उजळवशील.आता तुला तुझ्याच घरी आणायसाठी त्यांची परवानगी घ्यायची हे जरा पटत नाही

ग मला.काय करू सवय लागली आहे न हे म्हणायची....

"बाप आहे मी तिचा!!! "

-प्र.ज्ञा. जोशी

Comments

Popular posts from this blog

पहिलं घर

घर कशाला म्हणायचा हा प्रश्न मला माझं सोलापूरचं घर सोडल्यापासून सतत पडत आलाय. नोकरीनिमित्त मी ज्या ज्या ठिकाणी गेले आहे आणि राहिले आहे ते प्रत्येक घर मला माझं आणि आपलं वाटलं आहे. त्या प्रत्येक घराने मला भरभरून प्रेम आणि यश दिलं आहे. आयुष्य झपाट्याने बदलत गेलं आणि आम्ही एका अश्या देशात आलो, ज्याला आपलं म्हणताना किंवा त्या देशाने आम्हाला आपलं म्हणत असतानाच आम्ही एक मोठा निर्णय घेतला आणि ह्या देशात आमच्या नावाचं एक घर उभं राहीलं.  पहिलं घर घेणं हा एवढा भावनिक निर्णय का असतो? विचार करत गेलं की समजतं, ही गोष्ट फक्त एका कागदावर सही करणं असतं का? पैसे देऊन तर आपण भाड्याच्या घरात पण राहतो मग स्वत:च्या नावावर असलेल्या घराची ही ओढ कसली? पृथ्वीवर माणूस उपराच म्हणतात, त्याच पृथ्वीच्या अवाढव्य गोलावर एक ठिपका माझा! मी इथे जगून गेलो, कष्ट करून गेलो, काही कमावून गेलो त्याचं हे प्रतिकात्मक रूप, असा विचार माणसं करत असतील का? की माझं म्हणजे जिथे मला काहीही करण्याचं स्वातंत्र्य! ह्या स्वातंत्र्याची ओढ त्यात असावी. कारण काहीही असलं तरी हा निर्णय भावनेने भरलेले असतो हे मात्र नक्की.  मध्यंतरी कुठे त...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...

रिकामं घर आणि लेखकांची मैफिल

आमचं घर शिफ्टिंगचं काम संथ गतीने चालू आहे. मागच्या काही महिन्यात आम्ही इतकी धावपळ करतोय की आता शिफ्टिंगचं काम आरामात हळूहळू करतोय. तर सगळ्यात आधी प्रथेप्रमाणे नवीन घरी पुस्तकं गेली. आज पुस्तकांचा शेवटचा लॉट तिकडे नेल्यावर रिकाम्या हॉलमध्ये दोघे बसलो होतो.   पुस्तकांकडे प्रेमाने नजर फिरवताना, मला लक्षात आलं की ही पुस्तकं मी वेगवेगळ्या देशात, राज्यात, गावात खरेदी केलेली आहेत. मग त्यातले लेखक कवी पाहताना त्यांच्यात असलेलं साधर्म्य आणि फरक दिसू लागले. वैचारिक, आर्थिक, सामाजिक, भौगोलिक, राजकीय सगळ्याच बाबतीत वेगवेगळी मते असलेली ही बुद्धिवान माणसं!   काही पुस्तकं मला इथल्या मित्रमंडळींनी भेट दिलेली आहेत तर काही अनोळखी पुस्तकप्रेमी लोकांनी दिलेली आहेत. सगळ्याच विषयांवरची पुस्तकं आहेत. काही लेखक कवी हयात आहेत तर बरेचसे या जगात आता नाहीत.    हा विचार डोक्यात घोळत असतानाच जय निघूयात म्हणाला आणि आम्ही दरवाजा बंद करून निघू लागलो. बागेकडे असलेल्या खिडकीतून उन्हाची तिरीप पुस्तकांच्या गठ्ठ्यांवर पडली होती. ते चित्र विहंगम दिसत होतं म्हणून का काय माहिती नाही, पण मला वाटलं, आम्ही इथू...