Skip to main content

एका हृदयात किती शहरं

 


एका हृदयात किती शहरं मुक्काम करत असतील?

होय हृदयात!
आपण एखाद्या गावी वा शहरी वास्तव्याला जातो तसंच शहरंही राहतातच की आपल्या मनात मुक्कामी!
कधी तिथल्या आठवणींच्या रूपात,
कधी तिथे जाण्याच्या स्वप्नांच्या रूपात,
कधी तिथे मिळालेल्या धड्यांच्या रूपात,
तर कधी अनुभव/ पैसा/प्रेम इत्यादीचं घबाड हाती लागल्याच्या रूपात…
प्रत्येकाला कुठे ना कुठे जायचं असतं.
म्हणजे जागेच्या संदर्भातच नव्हे.
अगदी काळाच्याही बाबतीत!
कुणाला सतत भूतकाळात जायला आवडतं,
तर कुणाला भविष्याची आस असते.
कुणाला करीयर वा आर्थिकदृष्ट्या वरच्या पोझीशनवर जायचं असतं,
कुणाला शेजारच्याहून पुढे जायचं असतं,
कुणाला घरापासून दूर जायचं असतं,
कुणाला घरी जायचं असतं.
तर कुणाला सगळ्यांपासून लांब कुठे तरी पळून जायचं असतं. पण प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी जायचं जरूर असतं.
आहे त्या क्षणात ,आहे तिथे, आहे तसं जगणारे अगदी दुर्मिळ!
गावं किंवा शहरही कुठे कुठे जात असतात बरं!
कधी जगाच्या नकाशावर,
कधी कुणा दूसऱ्या देशाच्या इतिहासात हिरो म्हणून किंवा व्हिलन म्हणूनही!
कधी एखाद्या पुस्तकात, कधी कुणाच्या छायाचित्रात,
कधी कुणाच्या यशाच्या पायऱ्यांवर वा कधी एखाद्याच्या अपयशाच्या घसरगुंडीवर!
कधी एखाद्या सिनेमात तर कधी एखाद्याच्या बकेट लिस्टमध्ये!
अशी ही गावं कधी कधी मनात राहतात, रेंगाळतात आणि आपलीच होऊन जातात.
माझ्याबाबतीत हे नेहमी होतं.
मला शहरं माणसांसारखी वाटतात.
प्रत्येक शहराला इतिहास, भुगोल, हवा, आकार, गती, वृत्ती, राजनीती, प्रगती, संस्कृती असते.
त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर बसावं तसं माझं प्रेम शहरावर बसतं.
शहर म्हणजे तिथला सत्तारूढ पक्ष का?
नाही.
शहर म्हणजे इतिहासाच्या खुणा मिरवत भविष्याकडे धावणारी कविता!
या कवितेचे नायक- खलनायक बरेच,
श्रोते वा प्रेक्षकही बरेच पण यमक जुळवणारा कवी एकच -
खुद्द शहर!
या शहरांच काव्य ऐकू आलं की मग आपसूक प्रेमात पडतो आपण!
प्रत्यक्षात कधी न गेलेल्या शहरांनी पण मुक्काम केलाय मनात!
त्यांना प्रत्यक्ष भेट देईन तेंव्हा आधी मिठीच मारेन मी घट्ट!
मग त्यांचं काव्य त्यांच्या तोंडून ऐकेन आणि त्याला माझी माझी एक चाल लावून आमचं एक गाणं करीन.
या गाण्याचा प्रत्येकाचा भाव वेगळा!
गाणं आठवलं की हा भाव आठवेल.
भाव कुठून येईल तर तिथे आलेल्या अनुभवांवरून!
जसं की
माझं आणि सोलापूरचं गाणं म्हणजे एक गोड अंगाई गीत आहे.
माझं आणि पुण्याचं गाणं म्हणजे कधी संपूच नये वाटणारी एक नाटकाची नांदी आहे.
माझं आणि मुंबईचं गाणं म्हणजे एक माऊथ ऑर्गनवर वाजणारं स्वप्नाळू स्फुरणगीत आहे.
माझं आणि मी आत्ता राहते त्या फिनीक्सचं गाणं म्हणजे मला परिचीत नसलेलं पण आवडलेलं अन् मी ठेका धरलेलं मेक्सिकन जॅझ म्युझिक आहे.
आणि मी आता नाताळ साजरा करायला जिथे चाललेय त्या शहराने मनात आधीच घर तर केलंयच पण फ्रॅंक सिनात्राच्या आवाजात गातंय हे शहर त्याची धून माझ्या कानात!
जगभरातून ! होय जगभरातून लोक येतात त्याने साजरा केलेला नाताळ पाहायला.
मला ह्या माणसांना पाहायचं कारण जगभरातून आलेल्या ह्या लोकांना पाहणं म्हणजे एका क्षणासाठी एकाच फ्रेममध्ये जग पाहिल्यासारखं आहे.
आणि ह्या माणसांच्या गर्दीत शहराच्या खुणा शोधायच्या आहेत.
या शहराचा इतिहास वाचून मग चाललेय त्याला भेटायला कारण पुढच्या वर्षी त्याचा ४००वा वाढदिवस आहे आणि एवढ्याच वर्षात जगाच्या छातीवर आर्थिक राजधानी म्हणून गॉगल घालून कडक फॅशनमध्ये बसलेलं हे शहर माझं कुतूहल जागं न करतं तरच नवल!
खूप सत्तांनी त्याच्यावर राज्य केलं पण सगळ्या शृंखला झुगारून ,स्वातंत्र्यदेवीची पूजा मांडून, आकाशाला भिडणाऱ्या त्याच्या कर्तृत्वाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तळपत्या इमारतींनी जणू त्यानं जगाचे डोळेच दिपवले!
त्याच्या कवितेत जगातल्या सगळ्या भाषा आहेत.
स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना जणू ते शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला,
“ तु तुला पाहिजे तसं जग!
इथं तुला कुणी काही बोलणार नाही”
असं सांगतं त्यामुळे बऱ्याच अतरंगी लोकांना पाहण्याची नामी संधी आहे!
त्याच्या या स्वभावामुळेच जगातल्या लोकांना त्याच्याकडे यावं वाटतं त्यात नवल काय!
बिलेनियर्सपासून ते अगदी बेघर लोकांपर्यंत सगळ्यांना त्याच्या दारात जागा!
माझं आणि जयचं हे वर्ष इतकं धामधूमीत आणि धूमधडाक्यात गेलंय की त्याचा शेवट गोड करायला ह्या मोठ्या सफरचंदाचा घास घ्यायचा मोह होणं स्वाभाविक होतं.
माझ्यासोबत या प्रवासात तुम्हालाही घेऊन जायच्या विचारांत आहे. पेन, मॅकबुक आणि कॅमेरा तिघांनीही तयारी दाखवली आहे.
फक्त माझ्यातला आळस ख्रिसमसच्या सुट्टीवर गेला की झालं मग!
भेटूयात!
तोवर नाताळच्या रोशनाईसारखं आयुष्य झगमगूदे🎄
- नव्या शहराच्या प्रेमात पडलेली प्रज्ञा

Comments

Popular posts from this blog

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...