Skip to main content

मातीतला कवी



मातीत लोळणाऱ्या, त्यातच मोठ्या झालेल्या माणसाला एकदा कविता सुचली.

त्याच मातीत, त्याच मातीवर

त्याने ती लिहून काढली 

मग दुसरी सुचली.

आभाळ, पाणी, दुष्काळ, गवत, करपलेली पिकं, झाडाशी लटकणारे गळे, कर्जाच्या पावत्या, घामेजलेले काळवंडलेले चेहरे आणि सदरे, रापलेल्या बाया, राकटलेले बाप्ये...

हे सगळे सगळे एक एक कविता देऊन गेले त्याला.

का लिहीत होता हे त्यालाही माहिती नव्हतं 

त्या माणसाचा आता कवी झाला होता.


आता जे दिसत नव्हत ते दिसू लागलं.

नको तितकं दिसू लागलं.

मग डाचू लागलं!

मग कवीला भेट मिळालेली अस्वस्थता,

त्यालाही भेट म्हणून स्वीकारावी लागली.

आणि त्यातुन मग मळणीतून खाली मोत्यासारखे दाणे पडावेत तसे एक एक टपोर शब्द पडू लागले.


शेतीत आणि कवितेत फारसा फरक वाटलाच नाही त्याला.

मनात उठलेली उबळ बियांसारखी दाबून टाकायची

मनाच्या कसदार जमिनीत,

मग कधी आसवांचा पाऊस होतो, 

तर कधी भावनेचं खत त्याला घालायच. 

अस्वस्थ होऊन बियांमधून कोवळं रोप बाहेर यावं 

तशी कवितेची प्रेरणा बाहेर येते मग!


तिला आंजारायचं गोंजारायचं काही काळ, 

मग आपणच आधी मनात मोठं करायचं, 

लोकाहाती देण्याएवढं झालं की मग लिहून काढायचं 


मग कुणी तरी भला प्रकाशक येतो त्याची वहीतून कापणी करुन चांगल्या बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांच्या बाजारात तिला नेऊन बसवतो. 

मळक्या कागदावरून उठून आता ती बुकबाइंडिंग केलेल्या शुभ्र पानांवर विराजमान झालेली असते. 


जसं सुपर मार्केटमध्ये हातात उचलेल्या आकर्षक पॅकेजिंगच्या धान्याच्या पिशवीकडे बघून ते धान्य पिकवलेल्या शेतकर्‍याचे भेगा पाडलेले, काळवंडलेले थकलेले हात आपल्याला दिसत नसतात. तसंच आता कवितेचं झालेलं असतं. 


“मातीतला कवी” वगैरे म्हणून बिरुद मिळालेलं असतं. 

तो हातात ते कवितेचं पुस्तक घेतो. 

त्याने लिहिलेलं शब्द आता त्यालाच परके वाटू लागतात. 

आपले असून त्यानं तो परक्यागत जवळ घेतो. 

आपल्या हाताचा पानावर डागबिग तर पाडणार नाही म्हणून बिचकतो. 


त्याने न दिलेला एक चकाचक सुगंध त्या पानांना येत असतो. 

आयुष्यभर धोतर घातलेल्या बापाला अचानक एक दिवशी सुटबुटात स्टेजवर मान्यवरांमध्ये नेऊन बसवलं तर तो कसा बिचकेल तसे आपले शब्द बिचकताहेत का काय ह्या पुस्तकात असंही त्याला वाटून जातं. 

मळक्या बांडातच कविता शोभून दिसत होती असंही वाटून जातं. 


मग एके दिवशी प्रकाशन सोहळ्याचा घाट घातलेला असतो. 

मातीतल्या कवीला त्या झगमगाटात जमिनित गाडून घ्यावसं वाटतं. 

सगळे कविवर्य कवितांवर खूप खूप बोलतात. 

संवेदनशीलता, खरा कवी, दुःख, बळीराजा, त्याचे भोग, राजकारण वगैरे वगैरे बक्कळ भाषणं झाडतात. 

एवढं सगळं कळतंय ह्या लोकांना मग यांना का काही करावं वाटलं नसेल शेतकऱ्यासाठी?

त्याला वाटतं राहतं.


तो फार काही बोलत नाही. मला इथे यायचा मान दिला म्हणून धन्यवाद वगैरे म्हणून गप्प राहतो.

२४ हजाराचं देणं फेडणं झालं नाही म्हणून आत्महत्या केलेल्या तात्याचं प्रेत त्याला आजूबाजूच्या शानदार गाड्या, लाखांचे कॅमेरे, फोन्स, बॅग्स, ह्या सगळ्यात दिसू लागतं.


चोवीस हजार फक्त चोवीस हजार!!!

ह्या सगळ्या झगमगतात अगदी नगण्य!

तात्याच्या जीवासारखे.

आपल्यासारखे!

घुसमाट वाढू लागते. 

एसीत पण घाम येतो.

वावरातल्या गार वाऱ्याची आठवण होते. 


कवी पळत सुटतो. 

मुकाट!

बेभान!

शेत दिसेपर्यंत 

मातीत येतो. लोळतो. अंगावर माती लावतो. 


मातीला म्हणतो, 

“नाही!! तुझ्या पोटातून आलेल्या पिकाला तेवढा भाव,

जेवढा तुझ्यावर लिहिलेल्या कवितेला आहे.

विकली. मी तुझी कविता विकली!!

ज्यांना मातीचा गंधच ठाऊक नाही अश्या बाजारात न्यून विकली. 

आता कुठली कविता अन् काय”


मातीतला कवी मातीत डोकं खुपसून खूप रडतो. 

मग शांत होतो. खूप शांत. 

आता ना त्याला कविता सुचते, ना शब्द. 

भावना वगैरे पण उठत नाहीत. 

सगळं दाबून जातं. कवीमन दुष्काळात पिक करपून जावं तसं करपून जातं. 


कवी राकट दिसू लागतो. 

तात्यासारखा, कवीच्या बापासारखा.

त्याचा पुन्हा शेतकरी होतो. 


प्रत्येक शेतकरी कविता ना लिहिलेला पण कविता जगलेला एक कवीच असतो. 

का एक अख्खी कविताच कदाचित....


हे सगळे प्रश्न मातीत गाडून,

मातीतला कवी “आभाळाएवढा शेतकरी” होतो.


- प्र. ज्ञा. जोशी

Comments

Popular posts from this blog

बातम्यांच्या ढिगाऱ्याखालचं बोथट मरण

रोज कुठून तरी कुणाच्या तरी मृत्यूच्या बातम्या येणं इतकं नियमित झालं आहे की त्या घटनेतून मुव ऑन होऊन पुढे जाता जाता आपण मरणाबद्दलची किंवा एकंदरितच माणसाच्या आयुष्याबद्दलची संवेदना हरवून चाललो आहोत की काय असं वाटायला लागलं आहे. एक मैत्रीण परवा सहज बोलून गेली, “सोशल मिडिया उघडला की जगाच्या पाठीवर कुणी तरी मृत्यूमुखी पडले याची बातमी असतेच. आधी खूप वाईट वाटायचं आता मी सहज स्क्रोल करते इतक्या बातम्या दिसत राहतात!”  मला धक्काच बसला. आधी असे अपघात, अकाली मृत्यु घडत नसतील का तर घडत होते पण आपल्यापर्यंत त्या बातम्या सहज पोहोचायच्या नाहीत. वर्तमानपत्रात, फार तर कुणी सेलिब्रिटी अथवा त्या शहरांत अशी काही घटना घडली तर त्याबद्दल छापून येण्याइतकी जागा मर्यादित असे. जगभरातल्या मृत्यूवार्ता छापून येण्याचा स्कोपच नव्हता.  दूसरं माध्यम म्हणजे टिव्ही. तो प्रत्येकाच्या घरी असेल का हा दूसरा मुद्दा. त्यात त्यावर डेलीसोप पाहिले जातात की बातम्या हा मुद्दा आला. टिव्हीवरच्या बातम्यांनाही वेळेचं बंधन होतं. आतासारखी टिआरपीची जीवघेणी स्पर्धा नव्हती.  आता मात्र तसं राहिलं नाहीये. वेळेचं, काळाचं, जागेचं ...

आमच्या मिशलीन भानगडी

आजवर आम्हा दाम्पत्याला दोनदा मिशेलिन स्टार रेस्टोरेंटमध्ये खाण्याचा योग आला. मजा अशी की दरवेळी खाताना किंवा खाऊन झाल्यावर आम्हाला ते रेस्टोरेंट मिशेलिन स्टार प्राप्त आहे हे कळले आहे. पहिला अनुभव इटलीत घेतला आणि दुसरा सॅन फ्रान्सिस्कोत! पहिलं रेस्टॉरेंट इतकं ऑथेंटीक इटालियन होतं की तिथल्या कुणाला इंग्लिशही येत नव्हतं. तो अनुभव नंतर आज हा सॅन फ्रान्सिस्कोमधील! एक तर ह्या शहरात अप्रतिम चवीच्या पदार्थांची रेलचेल आहे. त्यात हे भारतीय पदार्थांचं रेस्टॉरेंट आणि त्याला मिशेलिन स्टार!! किती सुरेख गोष्ट! तर! सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आमच्या हॉटेलजवळ पाचच मिनीटांवर हे रेस्टॉरेंट होतं. तिथे फिल्टर कॉफी मिळते हे कळलं आणि तिकडे निघालो. बाहेरून आतील रेस्टोरेंटचा अंदाज येत नव्हता पण आत गेलो तर एक सुरेख सजवलेली स्पेस होती. तिथे बसून नीट निरखल्यावर कळलं की कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये दक्षिण भारताच्या खुणा सांगणार्‍या वस्तू चित्रे सजवली होती. ते मॉडर्न आणि पारंपरिक मिश्रण इतकं बेमालूम जमलं होतं की ते रेस्टोरेंट नेमकं कुठलं कळत नव्हतं.  आमचा पुढचा दिवस आखलेला होता त्यामुळे जागा नाही तर बार चेअर चालेल म्हणून बार ...

शिवपार्वती पतये

  ज -  माझ्या आवडत्या देवांत महादेव सगळ्यात वर आहेत. प्र -  का रे? ज -  शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. तिला काही झालं तर ब्रम्हांड उलथं पालथं करून टाकतात. वैराग्यवस्था फक्त तिच्यासाठी टाकून गृहस्थ होतात. मला त्यांचं प्रेम माझ्या खूप जवळचं वाटतं. प्र -  तू तसाच आहेस न म्हणून! ज - ओहोहो ! बिग वर्ड मई बिग वर्ड !! प्र -  अरे खरंच की. प्रेम करणं तर झालंच पण व्यक्तिशः पण शिवतत्व जागृत आहे तुझ्यात. जगाच्या टीका वा कौतुकाची पर्वा नसलेला. आपल्या स्पेसमध्ये ध्यानस्थ असल्यासारखा आपलं काम करत राहणारा. ना आपलं कर्तृत्व कुणाला सांगणारा ना कधी कौतुकाची अपेक्षा करणारा, किंचित गर्व नसणारा. अतिशय कंटेंट असलेला माझा शिव! ज -  त्याचं कारण माझ्या आजूबाजूला आहे. माझी शक्ती मला इतकं दणदणीत साजरं करते की मला कधी दुसऱ्याच्या कौतुकाची गरजच पडत नाही. तिने माझा हात पकडला की जगात काहीही करू शकेन एवढा आत्मविश्वास आपोआप येतो. जगाचे लाख शब्द आणि मईचा एक शब्द असा रेशो आहे. त्यामुळे मी शांत, समाधानी, कंटेंट राहणं साहजिक आहे. देवीतत्वासोबत राहतो मी, कुणाच्या टीकेची काय पर्वा मला! परत सांगतो...