Skip to main content

मातीतला कवी



मातीत लोळणाऱ्या, त्यातच मोठ्या झालेल्या माणसाला एकदा कविता सुचली.

त्याच मातीत, त्याच मातीवर

त्याने ती लिहून काढली 

मग दुसरी सुचली.

आभाळ, पाणी, दुष्काळ, गवत, करपलेली पिकं, झाडाशी लटकणारे गळे, कर्जाच्या पावत्या, घामेजलेले काळवंडलेले चेहरे आणि सदरे, रापलेल्या बाया, राकटलेले बाप्ये...

हे सगळे सगळे एक एक कविता देऊन गेले त्याला.

का लिहीत होता हे त्यालाही माहिती नव्हतं 

त्या माणसाचा आता कवी झाला होता.


आता जे दिसत नव्हत ते दिसू लागलं.

नको तितकं दिसू लागलं.

मग डाचू लागलं!

मग कवीला भेट मिळालेली अस्वस्थता,

त्यालाही भेट म्हणून स्वीकारावी लागली.

आणि त्यातुन मग मळणीतून खाली मोत्यासारखे दाणे पडावेत तसे एक एक टपोर शब्द पडू लागले.


शेतीत आणि कवितेत फारसा फरक वाटलाच नाही त्याला.

मनात उठलेली उबळ बियांसारखी दाबून टाकायची

मनाच्या कसदार जमिनीत,

मग कधी आसवांचा पाऊस होतो, 

तर कधी भावनेचं खत त्याला घालायच. 

अस्वस्थ होऊन बियांमधून कोवळं रोप बाहेर यावं 

तशी कवितेची प्रेरणा बाहेर येते मग!


तिला आंजारायचं गोंजारायचं काही काळ, 

मग आपणच आधी मनात मोठं करायचं, 

लोकाहाती देण्याएवढं झालं की मग लिहून काढायचं 


मग कुणी तरी भला प्रकाशक येतो त्याची वहीतून कापणी करुन चांगल्या बाजारात मिळणाऱ्या पुस्तकांच्या बाजारात तिला नेऊन बसवतो. 

मळक्या कागदावरून उठून आता ती बुकबाइंडिंग केलेल्या शुभ्र पानांवर विराजमान झालेली असते. 


जसं सुपर मार्केटमध्ये हातात उचलेल्या आकर्षक पॅकेजिंगच्या धान्याच्या पिशवीकडे बघून ते धान्य पिकवलेल्या शेतकर्‍याचे भेगा पाडलेले, काळवंडलेले थकलेले हात आपल्याला दिसत नसतात. तसंच आता कवितेचं झालेलं असतं. 


“मातीतला कवी” वगैरे म्हणून बिरुद मिळालेलं असतं. 

तो हातात ते कवितेचं पुस्तक घेतो. 

त्याने लिहिलेलं शब्द आता त्यालाच परके वाटू लागतात. 

आपले असून त्यानं तो परक्यागत जवळ घेतो. 

आपल्या हाताचा पानावर डागबिग तर पाडणार नाही म्हणून बिचकतो. 


त्याने न दिलेला एक चकाचक सुगंध त्या पानांना येत असतो. 

आयुष्यभर धोतर घातलेल्या बापाला अचानक एक दिवशी सुटबुटात स्टेजवर मान्यवरांमध्ये नेऊन बसवलं तर तो कसा बिचकेल तसे आपले शब्द बिचकताहेत का काय ह्या पुस्तकात असंही त्याला वाटून जातं. 

मळक्या बांडातच कविता शोभून दिसत होती असंही वाटून जातं. 


मग एके दिवशी प्रकाशन सोहळ्याचा घाट घातलेला असतो. 

मातीतल्या कवीला त्या झगमगाटात जमिनित गाडून घ्यावसं वाटतं. 

सगळे कविवर्य कवितांवर खूप खूप बोलतात. 

संवेदनशीलता, खरा कवी, दुःख, बळीराजा, त्याचे भोग, राजकारण वगैरे वगैरे बक्कळ भाषणं झाडतात. 

एवढं सगळं कळतंय ह्या लोकांना मग यांना का काही करावं वाटलं नसेल शेतकऱ्यासाठी?

त्याला वाटतं राहतं.


तो फार काही बोलत नाही. मला इथे यायचा मान दिला म्हणून धन्यवाद वगैरे म्हणून गप्प राहतो.

२४ हजाराचं देणं फेडणं झालं नाही म्हणून आत्महत्या केलेल्या तात्याचं प्रेत त्याला आजूबाजूच्या शानदार गाड्या, लाखांचे कॅमेरे, फोन्स, बॅग्स, ह्या सगळ्यात दिसू लागतं.


चोवीस हजार फक्त चोवीस हजार!!!

ह्या सगळ्या झगमगतात अगदी नगण्य!

तात्याच्या जीवासारखे.

आपल्यासारखे!

घुसमाट वाढू लागते. 

एसीत पण घाम येतो.

वावरातल्या गार वाऱ्याची आठवण होते. 


कवी पळत सुटतो. 

मुकाट!

बेभान!

शेत दिसेपर्यंत 

मातीत येतो. लोळतो. अंगावर माती लावतो. 


मातीला म्हणतो, 

“नाही!! तुझ्या पोटातून आलेल्या पिकाला तेवढा भाव,

जेवढा तुझ्यावर लिहिलेल्या कवितेला आहे.

विकली. मी तुझी कविता विकली!!

ज्यांना मातीचा गंधच ठाऊक नाही अश्या बाजारात न्यून विकली. 

आता कुठली कविता अन् काय”


मातीतला कवी मातीत डोकं खुपसून खूप रडतो. 

मग शांत होतो. खूप शांत. 

आता ना त्याला कविता सुचते, ना शब्द. 

भावना वगैरे पण उठत नाहीत. 

सगळं दाबून जातं. कवीमन दुष्काळात पिक करपून जावं तसं करपून जातं. 


कवी राकट दिसू लागतो. 

तात्यासारखा, कवीच्या बापासारखा.

त्याचा पुन्हा शेतकरी होतो. 


प्रत्येक शेतकरी कविता ना लिहिलेला पण कविता जगलेला एक कवीच असतो. 

का एक अख्खी कविताच कदाचित....


हे सगळे प्रश्न मातीत गाडून,

मातीतला कवी “आभाळाएवढा शेतकरी” होतो.


- प्र. ज्ञा. जोशी

Comments

Popular posts from this blog

जिया रा धाकधुक होये

 जिया रा धाकधुक होये रमाताई विमानात बसल्या आणि कानात हेडफोन्स घातले तर इंग्लीश विंग्लिशमधलं गाणं वाजलं. त्यातल्या काही ओळी ऐकून खरं तर त्यांचे डोळेच भरून आले. “पियाबीन दिल लगे ना मन मा लागे चैन, कैसे जाऊ मै पराये देस” अगदी त्यांच्या आयुष्यावरच बेतलेल्या ओळी वाटतं होत्या.  दिनेशराव गेले त्यालाही आता बरीच वर्षे उलटली होती. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार!  एकुलता एक आणि हुशार मुलगा पदरात टाकून ते अनंताच्या प्रवासास निघून गेले आणि खरंच त्यांच्या संसाराला दृष्ट लागली. स्वभावाने त्यांच्यासारख्याच असणार्‍या आणि कुशाग्र बुध्दीच्या त्यांच्या मुलाने, सत्याने वडीलांसारखा हुशार इंजिनियर होऊन आणि त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण केले.  आयटीची पंढरी मानल्या गेलेल्या अमेरिकेत जाऊन उच्चपदस्थ नोकरी मिळवली आणि रमाताईंनी सत्यजितला वाढवताना केलेल्या कष्टाचे चीज झाले. मागच्याच वर्षी त्याच्यासारखीच गोड, गुणी, हसरी मुलगी त्यांच्या घरी सून म्हणून आली आणि घर पुन्हा हसू खेळू लागलं. अमेरिकेला जाताच सुनेने रमाताईंचा विजा काढायला घेतला आणि, “आई आता वर्षाचे सहा महिने इकडे यायचं. पुढल्या सहा मह...

पुरुष असाही असतो

  “ तुझ्याशी बोलायचं होतं जरा. म्हणजे वेगळाच विषय आहे. मी मूर्ख असेन कदाचित म्हणून तिच्याकडे न जाता तुझ्याकडे येऊन सांगतोय. पण मला वाटलं हेच जास्त बरोबर आहे, मी चुकीचा असेन पण आता सांगतो.   तुझ्या होणाऱ्या बायकोवर बहुतेक प्रेम आहे माझं. तिला हे माहिती नाहीये. मी सांगितलं नाहीये आणि आयुष्यात कधी सांगणार पण नाहीये. पण ते आत मनात ठेऊन तिच्याशी मैत्र ठेवणं पाप वाटलं. तू आणि ती वेगळी आहात असं वाटतच नाही. आताशा मला तुझ्यात पण ती दिसते. तिच्याशीच बोलतोय असं तुझ्याशी बोलताना वाटतं, म्हणून मग तुला सांगतोय. कसलीही वेगळी वाईट भावना नाही, अपेक्षा नाही.   एकदा तिला तिच्या घरी खिडकीशी चहा गाळताना पाहिलं. खिडकीतून ऊन तिच्या चेहऱ्यावर पडलं होतं, गोड दिसत होती, केस सोनेरी चमकत होते, गाणं म्हणत स्वतःत गुंग होऊन काम करत होती. मनात काही तरी वेगळं फिल झालं, तिच्यावर जीव दाटून आला, हे चित्र आयुष्यात रोज दिसावं असं वाटलं, त्यात कसलाच शारीरिक विचार नव्हता. पण ती अशी दिसत नाही राहिली तर आत दुखेल, असं वाटलं. तेवढ्यात तिने तुझं नाव घेऊन, तुला चहात आलं जास्त आवडत नाही हे सांगितलं.  तुझ्याबद...

गुरू ईश्वर तातमाय

  गुरू ईश्वर तातमाय गुरूविण जगी थोर काय त्या पहिल्यांदा इंग्लंडला जाण्यास निघाल्या त्यावेळी मी सहावी सातवीत असेन. त्यांनी ते आम्हाला गाण्याच्या क्लासमध्ये सांगितलं. त्या एवढ्या मोठ्या काळासाठी दूर जाणार आहेत हे मला सहनच होईना. मला क्लासमध्येच रडू आलं. त्यावेळी मला बाईंनी “ प्रज्ञा हे पाहा अशी जाते आणि अशी येते बघ “ म्हणत समजावलं. त्या परत आल्याचं कळालं आणि क्लास नसूनही मी त्या खरंच आल्या आहेत का हे पहायला शाळेवरून त्यांच्या घरी गेले आणि त्या आलेल्या पाहून अतिशय आनंदात घरी गेले. त्यांचं थोड्या काळापुरतं दूर जाणं इतकं दुखवून गेलं, आज त्यांचं कायमचं जाणं कसं मान्य करायचं हे माझ्या आत असलेल्या त्या सातवीतल्या लहानग्या प्रज्ञाला माहिती नाही. माझ्या विचारांवर,असण्यावर,आयुष्य जगण्यावर,कलेकडे पाहण्याच्या दृष्टीवर, प्रवासावर आणि सगळ्यात प्रामुख्याने मी आज जे काही गाऊ शकते त्या संगीतावर संपूर्णतः ज्यांचा संस्कार आहे त्या माझ्या गुरू आजच्या दिवसापासून आपल्या आयुष्यात नाहीत, त्यांना आपण फोन करून बोलू शकत नाही ही भावना कशी पचवायची याची ट्रेनिंग दुर्दैवाने बाईंनी दिली नाही. आजाराने त्रासलेला असल...